Thursday, December 11, 2025

दाखल्यात गंभीर चुका ; शाळा प्रशासनावर आरोप

 

खोपोलीतील प्राथमिक शाळा क्र. 13 मध्ये चुकीची जन्मतारीख, चुकीचे जन्मस्थळ नोंद

* चुका दुरुस्त न करता पालकांना कामाला लावले जाते - पालकांचा आरोप

खोपोली / विशेष प्रतिनिधी :- खोपोली नगरपालिकेने दिलेल्या मूळ जन्मदाखल्याऐवजी चुकीचे हॉस्पिटल सर्टिफिकेट लावून बालवाडीपासून पुढील शाळेपर्यंत विद्यार्थ्याच्या जन्मतारीख व जन्मस्थळात गंभीर चुका करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या चुकीमुळे वर्षानुवर्षे पालकांची दिशाभूल होत असून शालेय प्रशासनाकडून दुरुस्ती नाकारल्यामुळे पालकांमध्ये संताप वाढला आहे.

* प्रकरण काय ? :- मुतस्कीम युनूस धतुरे (वय 37, राहणार हाळ खुर्द) यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा खरा जन्मदिनांक 14/09/1989 व जन्मस्थान माहेर हॉस्पिटल, खोपोली असा आहे. परंतु बालवाडी सेविकेने मूळ जन्मदाखला न लावता ‘माहेर हॉस्पिटलचे दुसऱ्या व्यक्तीचे प्रमाणपत्र’ जोडले, ज्यात आईचे चुकीचे नाव लतीफा मोहम्मद सईद धतुरे, चुकीची जन्मतारीख 11 / 08/ 1988, चुकीची जन्मवेळ 4.20 असे नमूद होते. हीच चुकीची माहिती पुढे युसुफ मेहर अली उर्दू प्राथमिक शाळा क्र. 13 मध्येही नोंदली गेली. विशेष म्हणजे शाळेने विद्यार्थ्याचे जन्मस्थळही चुकीचे लोणावळा पुणे असे नोंदवले आहे.

* शाळा प्रशासन दुरुस्ती टाळत असल्याचा आरोप :- धतुरे यांच्या म्हणण्यानुसार शाळेच्या मुख्याध्यापकांना दुरुस्ती करण्याची विनंती केली असता, ही चूक आधीच्या मुख्याध्यापकांनी केली आहे, आम्ही दुरुस्ती करू शकत नाही, तुम्ही गॅझेट करा, असे उत्तर दिले. दुरुस्तीसाठी कोणताही शासन आदेश नसल्याचेही सांगण्यात आले. यावरून पालकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, चुका शाळेने केल्या…आणि फेऱ्या पालकांच्या का ? पगार शाळा व शिक्षकाला…त्रास विद्यार्थ्यांना का ?

* पालकांचा शपथपत्राद्वारे दावा :- पालकांनी शपथपत्रावर स्पष्ट नोंदवले आहे की, जन्मदिनांक 14/09/1989 व वेळ 6.20, तर आईचे नाव नूरजहाँ युनूस धतुरे, वडिलांचे नाव युनूस इस्माईल धतुरे, जन्मस्थान माहेर हॉस्पिटल, खोपोली हेच बरोबर आहे. पालकांनी योग्य माहितीचे पुरावे जोडून शालेय दाखल्यात दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

* बर्‍याच विद्यार्थ्यांचे दाखले चुकीचे असल्याची माहिती :- या शाळेतून असे अनेक चुकीचे जन्मदाखले दिल्याचेही स्थानिकांकडून समोर येत आहे. यामुळे पुढील प्रवेश, शिष्यवृत्ती, सरकारी नोकरी, पासपोर्ट, आधार-पॅन लिंकिंग यासह अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना गंभीर अडचणी येऊ शकतात.

* प्रशासनाकडून तपासाची मागणी :- स्थानिक नागरिकांनी शाळेतील दाखला प्रक्रिया, जन्मदाखल्यांची नोंद, बालवाडी ते प्राथमिक शाळा दस्तऐवज पडताळणी यावर सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी भावना पालकांनी व्यक्त केली आहे.





अलिबाग जिल्हा कारागृहात आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन उत्साहात साजरा

 


कारागृहातील बंद्यांमध्ये मानवी हक्क व संरक्षणाबाबत जनजागृती

रायगड / प्रतिनिधी :- मा. मुख्य न्यायमूर्ती, मुंबई उच्च न्यायालय यांच्या सहमतीनुसार तसेच महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड - अलिबाग आणि अलिबाग जिल्हा कारागृह (वर्ग 2) यांच्या संयुक्त समन्वयाने 10 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन अलिबाग जिल्हा कारागृहात उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून कारागृहातील बंद्यांच्या मानवी हक्कांचे संरक्षण, मूलभूत अधिकार आणि त्यासंबंधीची जनजागृती करण्यात आली.

* बंद्यांच्या हक्कांविषयी सखोल मार्गदर्शन :- कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ विधिज्ञ ॲंड. मानसी म्हात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, दरवर्षी 10 डिसेंबर रोजी संपूर्ण जगात मानवाधिकार दिन साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश बंद्यांचे मूलभूत अधिकार जपणे आणि त्याबाबत त्यांच्यात जागरूकता निर्माण करणे हा आहे. यावेळी त्यांनी बंद्यांना समान प्रतिष्ठा, न्याय्य वागणूक तसेच मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्यास तक्रार कोठे व कशी करावी, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तक्रार करताना घ्यावयाच्या दक्षतेबाबतही त्यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली.

* समानतेचा व मानवतेचा संदेश :- यावेळी ज्येष्ठ दिवाणी न्यायाधीश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड - अलिबाग, श्रीमती तेजस्विनी निराळे यांनी मानवाधिकारांचे रक्षण करणे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे स्पष्ट केले. तुरुंगातील दैनंदिन अडचणींवर मात कशी करावी, बंद्यांनी आपल्या हक्कांची जाणीव ठेवावी, तसेच समता व मानवतेच्या आधारे मिळणाऱ्या वागणुकीचे महत्व त्यांनी अधोरेखित केले.

* पुरुष व महिला बंद्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद :- या कार्यक्रमास 173 पुरुष व महिला बंद्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. अशा उपक्रमांमुळे कारागृहातील बंद्यांमध्ये मानवी हक्कांबाबत जागरूकता वाढण्यास निश्चितच मदत होणार असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

* उच्चस्तरीय मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन :- हा कार्यक्रम अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे, वारके (भा.पो.से.) तसेच विशेष पोलिस महानिरीक्षक, कारागृह (दक्षिण विभाग), भायखळा, योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात अलिबाग जिल्हा कारागृहाचे अधीक्षक यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून करण्यात आली.

कार्यक्रमास अधीक्षक, अलिबाग जिल्हा कारागृह, विशाल बांदल, ॲंड. ए. डी. पाटील (उपाध्यक्ष), ॲंड. अमित देशमुख (सचिव), ॲंड. राजेंद्र माळी (खजिनदार) वकील बार असोसिएशन अलिबाग, ॲंड. शेखर कामथे (मुख्य लोक अभिरक्षक), ॲंड. निलोफर शेख, ॲंड. तन्मय म्हात्रे (सहाय्यक लोक अभिरक्षक), श्रीमती नितल म्हात्रे (लिपिक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण), ॲंड. विकास पाटील, ॲंड. हिना तांडेल, ॲंड. आदित्य कांबळे, ॲंड. पुनम राजंळकर (विधी स्वयंसेवक) तसेच कारागृह अधिकारी किशोर वारगे (तु.अ. श्रेणी 2), कुटे (सुभेदार), वाणी, वाघमारे (शिपाई) आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Wednesday, December 10, 2025

कर्जत प्रशासकीय भवनासमोर ‘पेड पार्किंग’ ?

 



महिला कर्मचाऱ्याकडून अरेरावी व अपमानास्पद वागणुकीचा नागरिकांचा आरोप ; चौकशीची मागणी

कर्जत / राजेंद्र शिवाजी जाधव :- कर्जत प्रशासकीय भवन परिसरात वाहन पार्किंगच्या नावाखाली नागरिकांकडून पैसे वसूल केले जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, मुख्य गेटवर नियुक्त करण्यात आलेल्या एका महिला कर्मचाऱ्याकडून सर्वसामान्य नागरिकांशी अपमानास्पद, अरेरावीपूर्ण वर्तन करण्यात येत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे ही नियुक्ती अधिकृत आहे की अनधिकृत ? पार्किंग शुल्क वसुली कोणत्या नियमाअंतर्गत केली जात आहे ? कर्जत प्रशासकीय भवनासमोर ‘पेड पार्किंग’ सुरू झाली आहे का ? असे सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहेत.


* प्रशासनिय भवन कुणाची मालमत्ता ? :- प्रशासकीय भवनात दररोज तहसील, प्रांत, महसूल व अन्य शासकीय कामासाठी शेकडो नागरिक येत असतात. अनेकजण स्वतःच्या दुचाकी, चारचाकी वाहनांतून तर काही बस, रिक्षा किंवा टॅक्सीने प्रवास करून कार्यालयात पोहोचतात. कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत वाहन उभे करणाऱ्या नागरिकांकडून “पार्किंगचे पैसे द्या, नाहीतर वरिष्ठांना तक्रार करीन”, “मी यूपी-बिहार वरून आलेली नाही”, असे वादग्रस्त वक्तव्य करीत धमकावले जात असल्याचा आरोप संबंधित महिला कर्मचाऱ्यावर करण्यात येत आहे.


या महिला कर्मचाऱ्यांकडून पत्रकारांनाही नियम शिकवले जात असून, अपमानास्पद टोमणे मारले जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रशासकीय भवनात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

* महिला कर्मचारी कुणाच्या आदेशाने नियुक्त ? :- कर्जत प्रशासकीय भवनाच्या मुख्य गेटवर असलेली ही महिला कर्मचारी तहसील कार्यालयामार्फत नियुक्त आहे की प्रांत कार्यालयामार्फत ? राज्य शासनाच्या शासकीय कर्मचारी नियुक्ती निर्देशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे का? संबधित महिलेला शासकीय पगार व शासकीय सोयी-सवलती तहसिलदार व प्रातं कार्यालय मिळवून देत आहे का ? की ही खाजगी स्वरूपाची नियुक्ती आहे ? जर ती अधिकृत असेल, तर पार्किंग शुल्क आकारण्याचा शासनाचा आदेश, परिपत्रक किंवा नियम लागू करण्यात आला आहे का ? या ठिकाणी सशुल्क पार्किंग असा फलक आहे का ? संबधित पार्कींग ठेकेदारीतून देण्यात आली असेल तर ठेकेदार कौन ? ही नियुक्ती प्रातांधिकारी अथवा तहसीलदार यांनी केली असेल तर पार्कींगचे पैसे तहसिलदार किंवा प्रातांधिकारी घेणार की शासनाच्या तिजोरीत जमा करणार का ? पार्कींगची रितसर पावती मिळणार का ? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. काही नागरिकांनी तर “ नागरिकांनी प्रशासकीय भवनात कामे घेवून येऊ नये यासाठीच ही नियुक्ती केली आहे का ? ” असा थेट सवाल उपस्थित केला आहे.

* याआधीही वादग्रस्त वर्तनाचा इतिहास ? :- सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, याच महिला कर्मचाऱ्याच्या वादग्रस्त वर्तनामुळे यापूर्वी जुने तहसील कार्यालय येथे तत्कालीन तहसीलदार शितल रसाळ साहेबांनी तिला कामावरून घरी पाठवले होते, अशी माहितीही समोर येत आहे. तरीही पुन्हा अशाच स्वरूपात तिची नियुक्ती कशी करण्यात आली, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.


* शासकीय मालमत्ता जनतेचीच - नागरिकांचा रोष :- कर्जत व खालापूर तालुका हा डोंगराळ तसेच औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा भाग आहे. येथे दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक शासकीय कामासाठी येतात. शासकीय जमीन व इमारती या जनतेच्या आहेत आणि तेथे कार्यरत अधिकारी-कर्मचारी हे संविधानातील कलम 21 च्या चौकटीत जनतेचे सेवक आहेत. त्यांना मिळणारा पगार, भत्ते व सुविधा या नागरिकांनी भरलेल्या कराच्या पैशातून मिळतात, याचा विसर संबंधित अधिकाऱ्यांना पडला आहे का ? असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत.

* तात्काळ कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा :- संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तात्काळ सखोल चौकशी करून संबंधित महिला कर्मचाऱ्याला त्वरित हटवावे, बेकायदेशीर पार्किंग वसुली थांबवावी, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी ठाम मागणी होत आहे.


अन्यथा यापुढे अशाच प्रकारे नागरिकांचा अपमान आणि अरेरावी सुरू राहिल्यास रायगड जिल्हाधिकारी व कोकण आयुक्त यांनी स्वतः लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, तसेच जनतेला रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ नये, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.



मधु कांबीकर : लोककलेपासून राष्ट्रीय गौरवापर्यंतचा संघर्ष, साधना आणि सर्वोच्च अभिनयाचा प्रवास

 


मराठी चित्रपटसृष्टीत काही कलाकार असे असतात, जे केवळ अभिनय करीत नाहीत तर जगलेले आयुष्यच पडद्यावर साकार करतात. मधु कांबीकर (मधु वामन जाधव) हे असेच एक बहुआयामी, संघर्षशील आणि अत्युच्च अभिनयशैलीचे नाव आहे. मधु कांबीकर ही नुसतीच उत्तम नर्तिका नाही, तर उत्तम अभिनेत्री आहे, असा गौरवोद्गार ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांनी आपल्या ‘लमाण’ या आत्मकथनात काढला, हेच त्यांच्या प्रतिभेची पोच दाखवणारे आहे.

* बालपण आणि लोककलेची पायवाट :- 28 जुलै 1953 रोजी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मालेगाव येथे जन्मलेल्या मधू कांबीकर यांनी शिक्षणाची सुरुवात मालेगाव येथेच केली. पुढील शिक्षण कांबी या गावात झाले. अवघ्या 11 व्या वर्षी पुण्यात बाळासाहेब गोखले यांच्याकडे कथ्थक नृत्याचे धडे घेतले, तर वयाच्या 13-14 व्या वर्षी गुरू पांडुरंग घोटीकर आणि लावणीसम्राज्ञी लक्ष्मीबाई कोल्हापूरकर यांच्या सान्निध्यात लावणी नृत्याची साधना सुरू झाली. येथूनच त्यांच्या लोककलेच्या तपश्चर्येला सुरुवात झाली.

* रंगभूमीवरील पहिली ठळक ओळख :- चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी प्रभाकर पणशीकर यांनी त्यांना ‘पुत्रकामेष्टी’ (1980) या नाटकात संधी दिली. लोककलावंत म्हणून त्यांची अवहेलना झाली, तरी प्रभाकर पणशीकर वडीलकीच्या नात्याने त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले. या नाटकातील अभिनयासाठी मधू कांबीकर यांना ‘नाट्यदर्पण - विशेष लक्षवेधी अभिनेत्री’ पुरस्कार मिळाला. पुढे ‘पेईंग गेस्ट’, ‘चंद्र जिथे उगवत नाही’, ‘आकाश पेलताना’, ‘फुलवंती’ अशा 19 नाटकांमधून त्यांनी सशक्त भूमिका साकारल्या.

* 'शापित’ आणि अभिनयाची सिद्धी :- 1982 साली आलेला ‘शापित’ हा चित्रपट मधू कांबीकर यांच्या कारकीर्दीतील मैलाचा दगड ठरला. ‘बिजली’ ही ग्रामीण, शोषित व वेठबिगार स्त्री - अक्षमतेपासून सक्षमतेपर्यंतचा तिचा प्रवास त्यांनी अस्सल वास्तवतेने उभा केला. या भूमिकेसाठी त्यांना 1983 - महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनय पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. यामुळेच त्यांची अभिनयक्षमता संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीने मान्य केली.

* सतत आव्हानात्मक भूमिका :- 'राघू मैना’, ‘हेच माझे माहेर’, ‘एक होता विदूषक’, ‘रावसाहेब’ या चित्रपटांतून मातृत्व, संघर्ष, लोककलावंताची वेदना आणि स्त्रीजीवनाचा प्रवास त्यांनी प्रभावीपणे मांडला. ‘हेच माझे माहेर’ मधील ‘शकू’साठी त्यांना 1985 चा राज्य पुरस्कार, तर ‘रावसाहेब’ साठी 1996 चा राज्य पुरस्कार मिळाला.

* मराठीपलीकडेही अव्वल ठसा :- 1999 साली गुजराती ‘साद’ चित्रपटातील संवादरहित अभिनयासाठी त्यांना गुजरात राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाला, हा त्यांच्या अभिनयाच्या जागतिक दर्जाचा पुरावा होता. 'आई कुलस्वामिनी तुळजाभवानी’, ‘संघर्ष जीवनाचा’ यांसारख्या चित्रपटांसाठीही त्यांना राज्य पुरस्कार मिळाले.

* लोककलेचे संवर्धन - मधूप्रीतम :- 1996 मध्ये त्यांनी ‘मधुप्रीतम’ संस्थेची स्थापना करून ‘सखी माझी लावणी’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून पारंपरिक लावणीचे जतन, संशोधन व सादरीकरण केले. याशिवाय ‘लक्ष्मीबाई कोल्हापूरकर प्रतिष्ठान’ स्थापन करून लोककलेप्रती आपली निष्ठा जपली.

* आजचे वास्तव - भावनिक पण प्रेरणादायी :- 2016 मध्ये रंगमंचावर असतानाच आलेल्या पक्षाघातानंतर त्यांचे आयुष्य स्थिर झाले. आज त्या बोलत वा हालचाल करीत नसल्या, तरी घरात चित्रपट सुरू झाला की त्यांच्या डोळ्यातून अश्रू किंवा चेहऱ्यावर हसू उमटते, असे त्यांच्या सुन शीतल जाधव सांगतात - हेच त्यांच्या कलेशी असलेल्या अतूट नात्याचे दर्शन घडवते.

* मराठी सृष्टीतील अढळ स्थान :- लोकनाट्य, नाटक, दूरदर्शन, चित्रपट आदी सर्व माध्यमांत सातत्य, दर्जा आणि आत्मिक अभिनय जपत मधु कांबीकर यांनी मराठी सृष्टीत एक अढळ मानाचे स्थान निर्माण केले आहे. 2018 साली मिळालेला झी चित्र गौरव जीवनगौरव पुरस्कार हा त्यांच्या अमूल्य योगदानाचा सन्मान आहे.

मधु कांबीकर म्हणजे अभिनय नाही, तो अनुभव आहे, संघर्ष आहे आणि मराठी मातीचा आवाज आहे.


संकलन - मानसी गणेश कांबळे 

(संपादक - माय कोकण न्यूज 24) 


Tuesday, December 9, 2025

नेरळ गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी अखेर जेरबंद

 


रायगड पोलिसांचे मोठे यश ; गावठी कट्टा, राऊंड व मोटारसायकल जप्त

नेरळ / नरेश जाधव :- रायगड जिल्ह्यातील नेरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गंभीर गोळीबार प्रकरणातील फरार आरोपींना अटक करण्यात रायगड पोलिसांना मोठे यश आले आहे. गुन्हा रजिस्टर क्रमांक 214/2025 अंतर्गत दाखल प्रकरणात पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना गुजरात व नाशिक परिसरातून शिताफीने अटक केली आहे.


सदर गुन्हा 24 नोव्हेंबर 2025 रोजी घडला असून, 25 नोव्हेंबर 2025 रोजी नेरळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 109, 126(2), 351(2), 3(5) तसेच भारतीय शस्त्र कायदा 1959 अंतर्गत कलम 3 व 25 लावण्यात आले आहेत.


* पूर्ववैमनस्यातून गोळीबार :- फिर्यादी सचिन अशोक भवर (वय 40, रा. धामोते - नेरळ) हे बदलापूर येथून कामावरून स्कुटीवर घरी जात असतांना, धामोते येथील पेशवाई रोडवर आरोपींनी संगनमताने सी. बी. झेड मोटारसायकल (MH-15-DE-8518) वरून त्यांचा पाठलाग केला. फिर्यादीला अडवून त्यांच्यावर गोळीबार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. तपासात हा प्रकार पूर्ववैमनस्यातून घडल्याचे निष्पन्न झाले आहे.


* आरोपींची अटक :- अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अविनाश जगन्नाथ मार्के (वय 45) सध्या रा. नेरळ, मूळ रा. खडकी, कोपरगाव (जि. अहिल्यानगर), दीपक विनायक कोळेकर (वय 40) रा. हिरावाडी, नाशिक.

विशेष म्हणजे, आरोपी अविनाश मार्के हा संगमनेर पोलिस ठाण्यातील खून प्रकरण (गु.र.नं. 72/2020) मधील फरार आरोपी असून, त्याच्यावर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, चोरी व आर्म ऍक्ट अंतर्गत 15 गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपी क्रमांक दोनवरही खुनाचा एक गुन्हा दाखल आहे.

* संयुक्त पथकाची कारवाई :- हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने आणि आरोपी फरार असल्याने, पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या निर्देशानुसार नेरळ व कर्जत पोलिस ठाण्याची संयुक्त तपास पथके स्थापन करण्यात आली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी गुजरात व नाशिक परिसरात असल्याची माहिती मिळाली. मात्र आरोपी वारंवार वास्तव्य बदलत असल्याने तपास आव्हानात्मक ठरत होता.

अखेर तपास पथकाने नाशिक परिसरात सलग आठ दिवस तळ ठोकून पाठलाग करीत 5 डिसेंबर 2025 रोजी आरोपींना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, 10 डिसेंबर 2025 पर्यंत पोलिस कोठडी (PCR) मंजूर करण्यात आली आहे.

* हत्यारे व वाहन जप्त :- आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा, जिवंत काडतूस (राऊंड), सी. बी. झेड मोटारसायकल (MH-15-DE-8518) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलिस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलिस अधीक्षक अभिजीत शिवथरे व उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड (कर्जत विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपासाची जबाबदारी सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी ढवळे (नेरळ), पो. उपनि. सुशिल काजरोळकर (नेरळ), पो. उपनि. सुशांत वरक (कर्जत) तसेच पोलिस अंमलदार स्वप्निल येरुणकर, सचिन वाघमारे, आर. बी. केकाण, आश्रुबा बेंद्रे, विनोद वांगणेकर यांनी बजावली.

या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी रायगड पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले असून, पुढील तपास कार्य सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.



Monday, December 8, 2025

खोपोलीत दत्तजयंती उत्सव भक्तीभावात साजरा

 


नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांची दत्तगुरूंच्या चरणी सदिच्छा व प्रार्थना

खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली शहरात दत्त जयंतीनिमित्त गुरुवार, 4 डिसेंबर 2025 रोजी भक्तीमय आणि श्रद्धेचा माहोल अनुभवायला मिळाला. “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” या सामूहिक घोषणांनी शहरभर वातावरण पावन झाले होते. पहाटेपासूनच भाविकांनी श्री दत्तगुरूंच्या दर्शनासाठी मंदिरांत गर्दी केली होती.

या पावन पर्वानिमित्त महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांनी शहरातील विविध भागांत आयोजित दत्तजयंती उत्सवस्थळी भेट देत श्री दत्तगुरूंचे दर्शन घेतले. दर्शनावेळी दत्तगुरूंच्या चरणस्पर्शाने अंतःकरणात शांती, श्रद्धा आणि अध्यात्मिक समाधान लाभल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

दर्शनप्रसंगी कुलदीपक शेंडे यांनी खोपोली शहरातील सर्व नागरिकांच्या आरोग्य, सुख-समृद्धी आणि सर्वांगीण प्रगतीसाठी दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना केली. शहराचा विकास, नागरिकांमधील ऐक्य आणि सामाजिक सलोखा अबाधित राहावा, अशीही त्यांनी सदिच्छा व्यक्त केली.

दत्तजयंतीच्या निमित्ताने शहरभर आरती, भजन, दत्तमालेचे पठण, धार्मिक प्रवचने आणि दीपप्रज्वलन अशा विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण शहर भक्तीरसात न्हाल्याचे चित्र दिसून येत होते.

दत्तजयंती उत्सवामुळे खोपोलीत धार्मिक एकात्मता, सांस्कृतिक परंपरा आणि अध्यात्मिक ऊर्जा अनुभवायला मिळाली. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा उत्सव श्रद्धा व आनंदात साजरा केला.

खोपोली नगर परिषद निवडणूक 2025 : मतमोजणीपूर्व सुरक्षा तयारीचा आढावा

 


मुख्याधिकारी पंकज पाटील यांची स्ट्रॉंग रूमला भेट ; 24 तास CCTV, अग्निशमन व कडक सुरक्षा व्यवस्थेची खात्री

खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर मतमोजणीपूर्व सुरक्षा व्यवस्था, पारदर्शकता व विश्वासार्हता अबाधित राहावी यासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी नुकतीच मतपेट्या ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक सर्व सुरक्षा उपाययोजना काटेकोरपणे राबविल्या जात असल्याची त्यांनी खात्री करून घेतली.

या भेटीदरम्यान पाटील यांनी स्ट्रॉंग रूम परिसरात 24 तास कार्यरत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सतत देखरेख सुरू असल्याची तपासणी केली. संपूर्ण परिसरातील हालचालींवर थेट नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवले जात असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले. सर्व सीसीटीव्ही यंत्रणा सुस्थितीत व कार्यरत असल्याची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेताना वीजपुरवठा खंडित झाल्यास तात्काळ सुरू होणाऱ्या पॉवर बॅकअप (बॅटरी) व्यवस्थेची तपासणी करण्यात आली. कोणत्याही परिस्थितीत सीसीटीव्ही, प्रकाश व्यवस्था अथवा अन्य सुरक्षायंत्रणा बंद पडू नये, यासाठी संपूर्ण बॅकअप प्रणाली सज्ज असल्याची खात्री करण्यात आली.

अग्निशमन सुरक्षेच्या दृष्टीने फायर फायटिंग प्रणाली पूर्णतः कार्यरत असून, फायर फायटर पथक 24 तास तैनात ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली. यासोबतच एबीसी (ABC) अग्निशमन सिलिंडरची पुरेशी उपलब्धता, तसेच अग्निशमन सुरक्षा अधिकारी व सुरक्षा अधिकारी पाळीपद्धतीने 24 तास तैनात असल्याचीही तपासणी पाटील यांनी केली. स्ट्रॉंग रूम परिसरात अधिकृत स्वाक्षरी नोंदणी, कडक प्रवेश तपासणी व प्रवेश नियंत्रण प्रणाली लागू असल्याचे आढळून आले.

निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी सर्व उमेदवार किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींना 24 तासांत कोणत्याही वेळी स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षा व्यवस्थेची तपासणी करता येईल, अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे मतमोजणीपूर्व संपूर्ण प्रक्रियेवरील विश्वास अधिक दृढ झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.

खोपोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ची मतमोजणी 21 डिसेंबर 2025 रोजी सेंट मेरी स्कूल, डी.पी. रोड, खोपोली येथे पार पडणार आहे. त्यासाठी आवश्यक सर्व प्रशासकीय व सुरक्षाविषयक नियोजन पूर्ण करण्यात आले असून, पोलिस विभाग, निवडणूक शाखा व सुरक्षा यंत्रणा पूर्ण समन्वयाने कार्यरत असल्याची माहिती मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी दिली.

मतमोजणी प्रक्रिया शांततेत, नियोजनबद्ध आणि पूर्णतः निष्पक्ष पद्धतीने पार पडावी यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.