Tuesday, February 3, 2026

छत्रपती शाहू महाराज शाळेत पार पडला ''हॅपी स्कुल " चा अनोखा उपक्रम...

 



खालापुर कर्जत/सुधीर देशमुख :- छत्रपती शाहू महाराज शाळेला "हॅपी स्कूल" म्हणून सजवण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन इनरव्हिल क्लबच्या जिल्हा अध्यक्षा डॉ. सावित्री रघुपती यांनी केले.


शाळेतील 10 वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी कशी करावी याचे प्रशिक्षण हिंदवी शाह यांनी दिले. कार्यक्रमात 150 विद्यार्थ्यांना पेन व बिस्किटे वाटण्यात आली. शाळेला स्पोर्ट्सचे साहित्य, पुस्तके, 2 व्हाईट बोर्ड आणि बोलक्या भिंती रंगवून देण्यात आल्या.


ही सेवा इनरव्हिल क्लब खोपोलीच्या सदस्या आणि क्लबच्या डोनेशनमधून करण्यात आली.  कार्यक्रमाला अध्यक्ष दिना शाह, आयपीपी जयश्री कलोशी, सेक्रेटरी मधुमिता पाटील, डॉ. सावित्री रघुपती, आयएसओ वर्षा शिवलकर, दिव्या मश्रू, रमिला पटेल, सारिका धोत्रे, डॉ. अर्चना जाखोटिया, अरुणा, तारा आणि मनीषा उपस्थित होत्या. शाळेचे मुख्याध्यापक बिचकर सर आणि शिक्षकही उपस्थित होते.

एक भावूक निरोप : लोकनेत्याच्या स्मृतींना खोपोलीकरांचे अभिवादन

 


खोपोली / मानसी कांबळे :- आजचा दिवस खालापूर तालुक्यासाठी अत्यंत जड अंतःकरणाचा आणि भावूक करणारा ठरला. जनसामान्यांचे नेते, स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अस्थिकलश आज दर्शनासाठी खालापूर तालुक्यातील विविध गावांतून फिरवण्यात आला. ज्या हातांनी विकासाची गंगा घराघरांत पोहोचवली, आज त्याच नेतृत्वाच्या पवित्र स्मृतींचे दर्शन घेतांना प्रत्येकाचे डोळे पाणावले होते.


* खोपोलीत जनसागराची श्रद्धांजली :- आज खोपोली शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात हा अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा मुजरा देण्यासाठी सकाळपासूनच खोपोलीकरांनी गर्दी केली होती. कार्यालयाचा परिसर केवळ एका राजकीय पक्षाचे कार्यालय न राहता, आदरांजली वाहणाऱ्या एका विशाल कुटुंबाचे केंद्र बनले होते.


* राजकारण पलीकडची आदरांजली :- उपमुख्यमंत्री अजितदादांचे व्यक्तिमत्व हे केवळ एका पक्षापुरते मर्यादित नव्हते, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. याप्रसंगी खोपोली शहरातील सर्वच राजकीय पक्षांचे ज्येष्ठ नेते, खोपोली नगर परिषदेचे सर्व पक्षांचे नगरसेवक व नगरसेविका, तसेच नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांनी आवर्जून उपस्थित राहून दादांच्या पवित्र स्मृतींना पुष्पहार अर्पण केला





Monday, February 2, 2026

खोपोली नगर परिषदेत वयोवृद्धांची गांधीगिरी!

 


* 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने बांधकाम अभियंता अनिल वाणींच्या दारात अर्धनग्न आक्रोश

* प्रशासनाच्या मुजोरीला कंटाळून शासकीय कार्यालयात न्यायासाठी कपडे काढले

* पाच वर्षांपासून गटाराच्या प्रलंबित कामासाठी 100+ फेऱ्या मारूनही दुर्लक्ष

* पोटं भरत नसतील तर आमचे कपडे घ्या, पण काम करा - संतप्त वृद्धाचा भावुक उद्गार


खोपोली / मानसी कांबळे - खलील सुर्वे :- एका 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला न्याय मिळविण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले, तेही अर्धनग्न होऊन...खोपोली नगर परिषदेच्या ढिसाळ, निष्क्रिय आणि अमानवी कारभाराने एका वयोवृद्धाला अक्षरशः गांधीगिरीचा मार्ग अवलंबवा लागला. ही घटना केवळ एका व्यक्तीची व्यथा नाही, तर संपूर्ण शहरातील प्रशासकीय उदासीनतेचे आणि बेजबाबदारपणाचे जिवंत उदाहरण आहे.


खोपोली येथील रहिवासी कस्तुरचंद चुनाजी राठोड (वय 67) हे गेल्या पाच वर्षांपासून आपल्या घरासमोरील गटार बांधकामाच्या प्रलंबित कामासाठी नगर परिषदेचे उंबरठे झिजवत आहेत. तब्बल शंभराहून अधिक फेऱ्या मारूनही नगर अभियंता अनिल वाणी आणि संबंधित प्रशासनाने त्यांच्या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.


पावसाळ्यातील पाणी साचणे, दुर्गंधी, आरोग्य धोका हे सर्व सहन करीत - करीत अखेर त्यांची सहनशक्ती संपली. सोमवार, 2 फेब्रुवारी 2026 रोजी नगर परिषदेच्या कार्यालयात थेट अनिल वाणी यांच्या समोर जाऊन राठोड यांनी अर्धनग्न होत आंदोलन केले. हातात फलक घेऊन, भावुक होऊन त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना विचारले की, “अधिकाऱ्यांची पोटं भरत नसतील तर आमचे कपडे घ्या... पण आमचे काम तरी करा!”


हा आक्रोश ऐकून उपस्थित नागरिकांच्या डोळ्यांत पाणी आले. एका वयोवृद्धाला अशा टोकाच्या पावलापर्यंत आणणाऱ्या प्रशासनाच्या मुजोरीबद्दल संताप व्यक्त होत आहे. “हे गांधीजींच्या सत्याग्रहासारखे आहे, अन्यायाविरुद्ध अहिंसक लढा, पण प्रशासनाने तरी जाग यावी!” अशी प्रतिक्रिया शहरवासीयांकडून येत आहे.


या घटनेनंतरही नगर परिषद प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. गटार काम सुरू होईल की नाही, याकडे आता संपूर्ण खोपोलीचे लक्ष लागले आहे. नागरिकांनी जोरदार मागणी केली आहे की, संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई व्हावी. राठोड यांच्या घरासमोरील गटार बांधकाम तातडीने सुरू व्हावे, नगर परिषदेच्या ढिसाळ कारभाराची चौकशी व्हावी.


खोपोली प्रशासनाने आता तरी जाग व्हावे...एका वयोवृद्ध नागरिकाच्या अश्रू आणि आक्रोशाने शहर जागे झाले आहे. अन्याय सहन करण्याची मर्यादा ओलांडली की, गांधीगिरीही टोकाची होते हे या घटनेने सिद्ध झाले. आता फक्त शब्द नाहीत, कृती हवी, अशी प्रतिक्रिया खोपोलीतून उमटत आहेत. खोपोलीचे मुख्याधिकारी डॉं. पंकज पाटील, नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, बांधकाम सभापती अनिल सानप सह खोपोलीतील सर्वपक्षीय नेते, लोकप्रतिनिधी वयोवृध्द कस्तुरचंद चुनाजी राठोड यांना न्याय देणार का ? की आमरण उपोषण, आंदोलन केल्याशिवाय राठोड यांना न्याय मिळणार नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.



Sunday, February 1, 2026

खोपोली नगर परिषदेचे 6 आरटीआय अर्ज फेटाळल्याने खळबळ

 


माहिती लपवली जात आहे का ? डॉं. रियाज पठाण यांचा गंभीर सवाल

* केंद्रीय माहिती आयोगाच्या आदेशांकडे दुर्लक्षाचा आरोप


खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली नगर परिषद यांनी केंद्रीय माहिती आयोगाच्या स्पष्ट आदेशांचा योग्य अभ्यास न करता तब्बल सहा आरटीआय अर्ज थेट फेटाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे नगर परिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शहरात एकच खळबळ उडाली आहे.


या प्रकरणावर तीव्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत डॉं. रियाज पठाण यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. नगर परिषद माहिती का लपवत आहे ? नेमके कोणते घोटाळे झाकण्याचा प्रयत्न सुरू आहे ? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आरटीआय अर्ज फेटाळण्यामागील कारणे संशयास्पद असून यातून काहीतरी दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.


माहिती अधिकार कायद्यानुसार नागरिकांना सार्वजनिक माहिती मिळणे हा मूलभूत हक्क आहे, असे असतांना केंद्रीय माहिती आयोगाचे आदेश डावलून आरटीआय अर्ज नाकारणे म्हणजे कायद्याचा अवमान असून लोकशाही व्यवस्थेलाच धक्का देणारी बाब असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.


डॉं. रियाज पठाण यांनी पुढे स्पष्ट केले की, या संपूर्ण प्रकरणाची सखोल, पारदर्शक व निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे. अन्यथा नगर परिषद प्रशासनातील संभाव्य गैरप्रकार कधीच जनतेसमोर येणार नाहीत. पूर्ण चौकशीशिवाय हे प्रकरण शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.


दरम्यान, या प्रकरणामुळे खोपोलीतील प्रशासकीय वर्तुळात अस्वस्थता निर्माण झाली असून नगर परिषद प्रशासन यावर कोणती भूमिका घेते, दोषींवर कारवाई होते का, की प्रकरण दडपले जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. आरटीआय अर्ज फेटाळण्यामागील नेमकी कारणे स्पष्ट करणे आता नगर परिषदेपुढील मोठे आव्हान ठरणार आहे.

Saturday, January 31, 2026

शिळफाटा येथे श्री विश्वकर्मा जयंती महोत्सव उत्साहात साजरा

 


* मान्यवरांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; समाजबांधवांचा मोठा सहभाग

खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली शहरातील शिळफाटा येथे श्री विश्वकर्मा जयंती महोत्सव अत्यंत उत्साहात व पारंपरिक भक्तिभावाने साजरा करण्यात आला. समाजातील एकात्मता, शिक्षण व कौशल्य विकासाला चालना देणाऱ्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.


या महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून खोपोली नगर परिषद गटनेते संदिप पाटील, स्थायी समिती सदस्य व नगरसेवक हरीश काळे, नगरसेविका रुपाली जाधव, नगरसेविका रुखसाना जलगांवकर तसेच उद्योजक राजेश नागपुरे उपस्थित होते. मान्यवरांनी समाजाच्या प्रगतीत शिक्षण, कौशल्य आणि उद्योग यांचे महत्त्व अधोरेखित केले.


कार्यक्रमाच्या मुख्य आकर्षणांपैकी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा विशेष ठरला. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल पालक व उपस्थितांनी अभिनंदन करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


श्री विश्वकर्मा भगवानांच्या प्रतिमेचे पूजन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाजोपयोगी उपक्रमांमुळे महोत्सवाला प्रसन्न वातावरण लाभले. आयोजन समितीने कार्यक्रमाचे नियोजन सुबकपणे पार पाडत उपस्थितांचे आभार मानले. शिळफाटा येथे साजऱ्या झालेल्या श्री विश्वकर्मा जयंती महोत्सवाने समाजातील ऐक्य, प्रेरणा आणि सामाजिक बांधिलकी अधोरेखित केली.

सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

 


* महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यांचा मान ; लोकभवन येथे साधेपणात शपथविधी


मुंबई / मानसी कांबळे :- महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एक महत्त्वाचा अध्याय जोडला गेला असून सुनेत्रा अजित पवार यांनी आज शुक्रवार, 31 जानेवारी 2026 रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या रुपाने महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.


मुंबईतील लोकभवन येथे पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते, मंत्री, आमदार व पदाधिकारी उपस्थित होते. शपथविधी सोहळा दुःखाच्या छायेत अत्यंत साधेपणाने पार पडला. समर्थकांना फुले, पुष्पगुच्छ न आणण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

अजितदादांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी

सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीने दिवंगत अजितदादा पवार यांच्या जनसमर्पित कार्याचा वारसा पुढे सुरू राहील, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीतील नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अजितदादांच्या दूरदृष्टी, निर्भीड निर्णयक्षमता आणि लोककेंद्रित राजकारणाची परंपरा सुनेत्रा पवार समर्थपणे पुढे नेतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


* राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा निर्णय :- अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाबाबत चर्चा सुरू होत्या. पक्षाला एकसंध ठेवण्यासाठी आणि सरकारमधील राष्ट्रवादीची भूमिका मजबूत रहावी यासाठी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद स्विकारावे, अशी मागणी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून होत होती. अखेर पक्ष नेतृत्व व महायुतीतील नेत्यांशी चर्चा करून त्यांनी हा निर्णय स्विकारल्याचे सांगितले जात आहे.


* अर्थखात्यावरही चर्चा :- दिवंगत अजित पवार यांच्याकडे असलेले अर्थ खाते, क्रीडा व राज्य उत्पादन शुल्क खाते पुढे कोणाकडे जाणार, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्थ खाते आपल्या ताब्यातच ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याबाबत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याचेही समजते.


* पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शुभेच्छा :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करीत सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू करणाऱ्या सुनेत्रा पवार जी यांना शुभेच्छा. मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पुढे नेतील.


* आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया :- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनीही सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत, राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्राकाकी यांनी शपथ घेतली, याचा आनंद आहे. अजितदादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही, पण किमान सुनेत्राकाकींच्या रुपात तरी आम्ही तिथे अजितदादांना पाहू, अशी भावना व्यक्त केली.


* खंबीर नेतृत्वाची अपेक्षा :- सुनेत्रा पवार या खंबीर वृत्तीच्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. बारामती मतदारसंघातील सामाजिक, शैक्षणिक व सहकारी संस्थांमधील त्यांचा अनुभव, तसेच पवार कुटुंबाचा राजकीय वारसा लक्षात घेता, आगामी काळात पक्ष संघटन मजबूत करणे आणि सरकारमध्ये प्रभावी भूमिका बजावणे हे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.


दुःखाच्या पार्श्वभूमीवर घेतलेली ही शपथ महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवे पर्व ठरणार असून राज्यातील जनतेच्या नजरा आता सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाकडे लागल्या आहेत.

Friday, January 30, 2026

अद्भुत नेतृत्वाचा ठायीचा विश्रांतीचा काळ सुरू झाला...

  


 खालापुर कर्जत/सुधीर देशमुख :- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि प्रभावशाली नेते अजित पवार यांचा आज विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याचा दुःखद वृत्त समोर आले आहे. राजकारणातील त्यांच्या दूरदृष्टी, प्रगल्भता आणि निर्भीड नेतृत्वामुळे महाराष्ट्राच्या लोकशाहीत त्यांनी स्वतःची वेगळी आणि ठळक ओळख निर्माण केली होती. कठीण निर्णय घेताना कधीच मागे हटणार नाही अशी त्यांची जिद्द लोकांना नेहमीच प्रेरणा देत आली. आज त्यांचा शून्य जेवढा भरुन निघणार नाही, तेवढाच हा समाजासाठी मोठा धक्का आहे.


लोकहितासाठी त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांची निष्ठा आणि प्रामाणिक सेवा आणी सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी कायम तत्पर असणारा नेता हरपला आहे. प्रत्येक वेळी मुख्यमंत्री पद थोडक्यात नीसटुन ते उपमुख्यमंत्री पदावर कार्यरत रहायचे,पण काम मुख्यमंत्री असल्यासारखेच करायचे,कारण ते नेहमी म्हणायचे मी कामाचाच माणुस आहे.करोना कालावधी मधे मंत्रालयात दिसणारा नेता,नेहमी कार्यकर्त्या साठी झटला.शेवटच्या क्षणी पण फाईली व अर्जाची पेपर सर्व ठिकाणी जमीनीवर पसरले होते .


कर्तव्यनिष्ठा, निर्णयक्षमता आणि विकासाची दूरदृष्टी यांचा आदर्श म्हणजे अजित पवार. आजरोजी बारामती चे शिल्पकार , भाग्यविधाते,राजे,अश्या विविध अलंकारीक उपाधी ने ज्यांना संबोधित करताना कंठ दाटुन येतात.त्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली.